मान्सूनपूर्व शेती कामात शेतकरी व्यस्त ; खते व बी-बियाण्यांच्या वाढत्या किंमतीमुळे चिंता
साक्री : तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामात शेतकरी वर्ग व्यस्त झाला असून, काही भागात हवामान खात्याच्या सुचविलेल्या अंदाजानुसार बेमोसमी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मात्र, रासायनिक खते व बी-बियाणे यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी विचारपूर्वक नियोजन करण्याकडे लक्ष देत आहे.
युगात यांत्रिकीकरणाच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, पेरणी केली जात आहे. शासनाने खते, बियाण्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमली पाहिजे, अशी मागणी शेतकरी बांधवांमधून करण्यात येत आहे. दुसरीकडे अद्याप कांदा पिकाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
कपाशीला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधव सोयाबीन, मका आदी पिकांकडे वळला आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांनी पाण्याचे नियोजन करून, पिके घेतली. मात्र, शेतमालाला भावच मिळत नसल्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात मजुरीचे दर, रासायनिक औषधे तसेच बियाणांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे