राज्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू
मुंबई । राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या भीषण अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या स्वतंत्र अपघातांमध्ये लहान मुलीसह पाच जणांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

रत्नागिरीत डंपरला कारची धडक; तिघांचा जागीच मृत्यू


रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा रेस्ट हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोंदियात भरधाव बोलेरोची धडक; तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आठवडी बाजारातून घरी परतत असताना लक्ष्मीचंद सेवईवार आणि त्यांची तीन वर्षीय मुलगी कुमारी पासी यांना भरधाव मालवाहू बोलेरोने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला, तर वडिलांवर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिसांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने पीडित वडिलांनी मुलीचा मृतदेह हातात घेऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी ‘पोलिस हाय हाय’च्या घोषणा देत रास्ता रोको केला. अखेर पोलिसांनी एका दिवसात आरोपीला अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संभाजीनगरात ट्रॅक्टरखाली चिरडून कामगाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरातील पिसादेवी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत 50 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र बाजीराव पाटील (रा. सिंहगड कॉलनी, एन-6) असे मृताचे नाव असून ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी होते. मंगळवारी रात्री दुचाकीवरून किराणा सामान घेऊन घरी परतत असताना मागून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.
राज्यात सलग घडत असलेल्या या भीषण अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.